आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २१ सप्टेंबर २०२५) -
रविवार म्हणजे बहुतेक जणांचा विश्रांतीचा दिवस. मात्र, स्वामी विवेकानंद आश्रमशाळा, किरमिरी येथील विज्ञान शिक्षक प्रमोद साळवे सर यांच्यासाठी रविवार हा सेवाभाव, संस्कार आणि विद्यार्थ्यांसोबत नव्या उपक्रमांचा दिवस असतो. सेवाश्रमी वृत्ती आणि विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक संस्कार देण्याची त्यांची धडपड या भागात प्रेरणादायी ठरत आहे. रविवारी मुलांसोबत कधी बागेची निगा राखणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, तर कधी भाजीपाल्याच्या सालींपासून जैविक औषधांची निर्मिती असे प्रयोग साळवे सर विद्यार्थ्यांना शिकवतात. राखेचा वापर करून कीड नियंत्रण करण्याचे प्रयोगही ते विद्यार्थ्यांना करून दाखवतात.
आश्रमशाळेत मुले २४ तास उपस्थित असतात. फक्त त्यांच्यासोबत वेळ घालवणारी व्यक्ती हवी असते, असे साळवे सरांचे मत आहे. “जल, जंगल आणि जमीन यांच्याशी मुलांची नाळ लहानपणापासून जोडली गेली पाहिजे. आपण दिशा दाखवली, की त्यांची दशा आपोआप बदलते,” असे ते सांगतात. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू, शाळेत फुलणारी फुले आणि परिसरातील स्वच्छता यामुळे आश्रमशाळेत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. नागरिकशास्त्र हा विषय बालपणापासूनच शिकविला गेला पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
साळवे सर म्हणतात, “ही शाळा, हे गाव, हा जिल्हा, हे राज्य आणि हा देश माझा आहे हे प्रत्येक बालकाच्या मनात रुजले पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छतेचे भान आणि झाडांची काळजी ही त्यांची स्वतःची जबाबदारी असल्याची जाणीव झाली, तर समाजात सुजाण नागरिक घडतील.” त्यांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल आणि संगणक यांचा वापर करताना विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांचा ध्यास जोपासण्याची सवय झाली, तर त्यांची बौद्धिक प्रगती होईल. परिणामी, देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा त्यांना विश्वास आहे.
#SundayForService #InspiringTeacher #PramodSalve #AshramSchoolInitiative #EducationWithValues #EcoFriendlyLearning #StudentEmpowerment #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.