सलग २२ वर्षे सुरू असलेला रक्षाबंधनातून सामाजिक ऐक्याचा संदेश
माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा परंपरा जपणारा उपक्रम
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ११ ऑगस्ट २०२५) -
जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील हिरापूर आणि खडकी या गावांमध्ये यंदा रक्षाबंधनाचा उत्सव सामाजिक ऐक्य, परंपरेचा सन्मान आणि आपुलकी जपत साजरा करण्यात आला. सलग २२ वर्षे या परंपरेत सक्रिय राहून माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक सुदर्शन निमकर (Ex MLA Sudarshan Nimkar) यांनी आदिवासी बहिणींना साळी-चोळीची भेट देत बंधुतेचा धागा अधिक बळकट केला. शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी हा सोहळा जागतिक आदिवासी दिन आणि आगस्ट क्रांती दिनाच्या स्मरणार्थ पार पडला. गावातील महिला, पुरुष, युवक-युवतींसह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाने ग्राम एकतेचा सुंदर संदेश दिला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, जेष्ठ नेते सुरेश केंद्रे, विमाशीचे माजी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, निवृत्त केंद्र प्रमुख सुधाकर चंदनखेडे, ग्रामपंचायत खडकी (हिरापूर) सरपंच नयना संदिप शिंदे/शेडमाके, तिरुपती पोले, बालाजी भुते, माधव निवळे, जंगु पा. सोयाम, भिमराव पाटील मडावी, पंढरी सलगर, शेवंता वरखेडे, सलमान इमाम खान पठाण उपस्थित होते. तसेच प्रभाकर उईके, जयदेव आत्राम यांच्यासह विमुक्त जाती-भटक्या जमाती आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोहळ्याची सुरुवात पाटन येथे शहीद क्रांतिवीर बाबुराव फुलेश्वर शेडमाके यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून झाली. आगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांना स्मरण करण्यात आले. या वेळी पाटन ग्रामपंचायत सरपंच सीताराम मडावी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर हिरापूर येथे गंगाबाई जंगु सोयाम आणि खडकी येथे लीलाबाई भिमराव मडावी यांनी रक्षाबंधन विधी करून उत्सवाचा शुभारंभ केला. यातून स्त्री-सन्मान, परस्पर जिव्हाळा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांनी याला कौटुंबिक संमेलनाचे रूप दिले.
सुदर्शन निमकर यांनी भाषणात सांगितले की, रक्षाबंधन केवळ बहिण-भावाच्या नात्यापुरते मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांमध्ये विश्वास, सुरक्षा आणि प्रेमाचे बंध निर्माण करण्याचा हा सण आहे. सरपंच नयना शिंदे यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह मान्यवरांचे स्वागत केले व निमकर यांच्या जिल्हा बँकेवर संचालक पदावर झालेल्या निवडीबद्दल अभिनंदन केले. सोहळ्याचे आयोजन सोयाम व मडावी परिसरासह ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.
सलग २२ वर्षे सुरू असलेली ही परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहता सामाजिक ऐक्य, ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि परस्पर आदराची भावना जपणारी ठरली आहे. खडकी व हिरापूरसाठी रक्षाबंधन हा सण नसून नातेसंबंध जपणारे आणि समाजाला एकत्र बांधणारे जिवंत बंध आहे, हे यंदाही स्पष्ट झाले.
#TribalDayCelebration #BrotherhoodFestival #22YearsOfTradition #UnityAndCulture #RakhiOfEquality #CommunityBond #AugustKrantiDay #sudarshannimakar #keshavthackeray #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.