चंद्रपूर जिल्ह्यात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 03 एप्रिल 2025) -
जिल्ह्यात वाढत्या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर फैलावत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने जिल्हाभर स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करत निवेदन सादर केले.
जिल्ह्यातील विविध तालुके व गावांचा आढावा घेतल्यानंतर अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे भयावह चित्र समोर आले आहे. ग्रामीण भागात सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरल्याने दुर्गंधी पसरत आहे, तसेच डेंग्यू, मलेरिया आणि इतर घातक आजारांचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील काही मोठ्या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात दूषित सांडपाणी, धूळ आणि अन्य प्रदूषक घटक उत्सर्जित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने पर्यावरणाची हानी होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका, ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा स्तरावर तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, झालेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, रुग्णमित्र कृष्णा गुप्ता, राजू देवागंन, घनश्याम टिकले आणि राहुल बेसेकर हे शिष्टमंडळात उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत महत्त्वाची असून, प्रशासन यावर त्वरित पावले उचलणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.