- वीर बाबूराव शेडमाके यांचा पुतळा हटविल्याने नांदा येथील समाज बांधव नाराज
- परवानगी नसल्याने पोलिस प्रशासनाने घेतली कठोर भूमिका
- पोलीस प्रशासनाने स्वत: संज्ञान घेत केली कारवाई
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
क्रांतिवीर वीर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नांदा येथे २० मार्चला क्रांतिवीर बिरसा मुंडा बहुउद्देशीय मंडळ, नांदा व आदिवासी समाज बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या थाटामाटात रॅली काढून वीर बाबूराव शेडमाके यांचा जयंती उत्सव साजरा केला. या निमित्त वीर बाबूराव शेडमाके यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. कार्यक्रमाला गावातील सर्वच राजकीय पक्षांची साथ व सहभाग होता. कार्यक्रमात स्थानिक पोलीसही उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा झाला. पुतळा बसविण्याकरिता आवश्यक परवानगी नसल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने स्वत: हून कारवाई करत अचानक पुतळा हटविण्याचे निर्देश दिले. आदिवासी समाज बांधवासह गावातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी पाेलिस प्रशासनाला पुतळा हटविण्याचे आदेश मागे घ्यावे अशी विनंती केली. परंतु पोलिस प्रशासनाने कुणाचीही विनंती मान्य न केल्याने अखेर वीर बाबूराव शेडमाके यांचा पुतळा रात्रीला उशीरा स्वयंस्फूर्तीने हटविण्यात आला. मोठय़ा आस्थेने वीर बाबूराव शेडमाके यांचा बसविलेला पुतळा हटविल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
गावातून कोणाचीही तक्रार झालेली नाही. केवळ परवानगी नसल्याने वीर बाबूराव शेडमाके यांचा बसविलेला पुतळा हटविल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजगी दिसली. फक्त परवानगी घेतली नसल्याने पोलीस प्रशासनाच्या आदेशाने पुतळा हटविला असे असतांनाही गावातील काही राजकारणी लोक तेढ निर्माण व्हावा यासाठी विरोधी लोकांवर तक्रार केल्याचा खोटा आरोपकरू नये व समाज बांधवाच्या भावना भडकावून आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करू नये. असे झाल्यास सक्त कारवाई करण्याची ताकीद पोलिस प्रशासनाने दिली आहे. यामुळे नांदा येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
अमरावती येथे पुतळा बसण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता नांदा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याकरिता विविध राजकीय पक्षांच्या दोन समित्या अमोरा समोर आलेल्या आहे. कायदा व सुव्यवस्था राखता यावी याकरिता पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नांदा येथील वीर बाबूराव शेडमाके यांचा बसविलेला पुतळा हटविण्यात आला आहे. आता समाज बांधवांना सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून शासनाची परवानगी घेऊनच पुतळा बसवावा लागणार आहे. आधीच परवानगी घेतली असती तर बसविलेला पुतळा हटविण्याची नामुश्की मंडळावर आली नसती.
परवानगी नसल्याने पुतळा हटविण्याचे निर्देश
पुतळा हटवावा अशी कुठलीही तक्रार कोणीही दिली नाही. शासन परवानगी नसल्याने पुतळा हटविण्याचे निर्देश दिले. रीतसर शासन परवानगी घेऊन पुतळा बसविला पाहीजे. पुतळा हटविण्याची कारवाई केली गेली नसती तर भविष्यात कोणी कुठेही पुतळे बसवतील व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे पोलीसांनी स्वत संज्ञान घेत पुतळा हटविण्याचे निर्देश दिले. समाज बांधवांनी सुद्धा आपली चूक स्वीकार करत पुतळा हटवून प्रशासनाला सहकार्य केले. यापुढे विना परवानगी पुतळा बसविणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- सत्यजीत आमले, ठाणेदार, पोलिस ठाणे गडचांदूर
परवानगी घेणे बंधनकारक
नांदा येथे महापुरुषांचा पुतळा बसविण्यासाठी ग्रामपंचायतला कोणत्याही प्रकारची परवानगी मागण्यात आलेली नाही. पुतळा बसविण्यासाठी परवानगी देण्याचा ग्रामपंचायतला कोणताही अधिकार नसून सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. विविध अटींची पूर्तता केल्यानंतरच जिल्हाधिकारी पुतळा बसविण्यासाठी परवानगी देतात महापुरुषांचे पुतळे बसविण्याकरीता परवानगी घेणे बंधनकारक आहे
- दिलीप बैलनवार, प्रशासक, ग्रामपंचायत नांदा










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.