- लक्कडकोट येथे नारीशक्तीचा विजय
- दारू दुकानाला महिलांचा विरोध
- ग्रामसभेत महिलांनी सर्वानुमते फेटाळून लावला देशी बारचा प्रस्ताव
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
महाराष्ट्र देशी बार या नावाने असलेली सी एल ३ थेट मुंबई येथून तेलंगणाच्या टोकावर असलेल्या लक्कडकोट या गावी स्थलांतरित करून सुरु करण्याकरिता ग्रामसभेचे नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याकरिता आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र गावातील प्रत्येक महिलांनी ग्रामसभेत हा प्रस्ताव फेटाळून लावला. यामुळे थेट मुंबई येथून लक्कडकोट येथे देशी बार सुरु करण्याचे दारूविक्रेत्यांना जबर चरपाक लागली आहे.
दारू दुकान बद्दल १० मार्च रोजी ग्रामसभेची नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हापासून पेसा अंतर्गत येत असलेल्या या गावातील महिला या प्रस्तावाला प्रखर विरोध दर्शवित होत्या. मात्र आज ग्रामसभेत महिलांनी सर्वानुमते विरोध दर्शविला व शेवटी नारीशक्तीचा विजय झाला.
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट ग्रामपंचायत बरखास्त झाली असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनाने अजुनही निवडणुका घेतलेल्या नाही, ह्यामुळे गावाचा कारभार बघण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला. प्रशासकांनी गावात देशी दारूला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविण्याच्या उद्देशाने ग्रामसभा आयोजित केली. असा आरोप गावातील महिलां, सुशिक्षत नागरिकांसोबत आदिवासी विकास परिषदेचे नेते महिपाल मडावी यांनी केला होता.
लक्ककडकोट ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असून या ग्रामपंचायत च्या हद्दीतील सर्व गावे ही आदिवासी बहुल आहेत. ग्रामीण क्षेत्र, मजुरी व शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने येथील नागरिक दारिद्र्यात खितपत पडले आहेत, अशिक्षितपणाचे प्रमाण जास्त असून प्रामुख्याने गोंड, कोलाम, पारधी, परधान ह्या आदिवासी जमातीचे लोक बहुसंख्येने आहेत. राज्याच्या अगदी सीमेवर वसलेल्या ह्या आदिवासी बहुल गावात देशी दारूच्या दुकानाला परवानगी दिल्यास गावात व्यसनाधीनता वाढेल, कुटुंबांची अर्थव्यवस्था कोलमडल्या जाईल, वादविवाद वाढतील व गावाचे सामाजिक आरोग्य खराब होण्याची शक्यता असल्यामुळे गावात दारू दुकानाला परवानगी देण्यात येऊ नये अशी आग्रही मागणी गावातील महिलां, सुशिक्षत नागरिकांसोबत आदिवासी विकास परिषदेचे नेते महिपाल मडावी यांनी निवेदनातून केली होती.
आज झालेल्या ग्रामसभेत महिलांनी प्रशासकांसोबत इतर अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. महिलानी दारूचे दुकान दूरची गोष्ट गावात यापुढे कोणीही दारु दुकानासाठी अर्ज सुद्धा करू नये. दारूसारख्या विषयावर ग्रामसभा सुद्धा ठेवू नये असे ठणकावून सांगितले. यावेळी सर्व महिला बचत गटांच्या महिला, तरुण मित्र मंडळ व सुशिक्षित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.