- पोलिस अधिकारी सुट्टीवर गेल्याने तपास खोळंबला
राजुरा -
राजुरा शहरातील इंदिरानगर वॉर्डातील कुमारी स्नेहल विजय आत्राम ही अल्पवयीन मुलगी गेल्या पंधरवाड्यात पासून बेपत्ता असून अद्याप तिचा ठावठिकाणा लागला नाही. राजुरा पोलिसांनी गंभीरपणे तपास करून माझ्या मुलीला आणून देण्याची द्या, अशी आर्त हाक या मुलीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत केली.
वडील व आई कामावर गेले असताना एकाएकी दुपारी कु. स्नेहल ही घरून बेपत्ता झाली. याविषयी तिच्या आई - वडिलांनी तातडीने राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. या मुलीच्या घरी एका महिलाकडून कपडे विकत घेतले होते, त्या दिवशी ही महिला पैसे मागायला आली होती. घरी आई - वडील नसतांना या कपडे विकणाऱ्या महिलेने आपल्या मुलीला पैश्यासाठी त्रास दिला आणि त्याच दिवशी ही मुलगी गायब झाली. आत्राम कुटुंबियांनी या महिलेवर संशय व्यक्त केला. याशिवाय एका व्यक्तीला पंचायत समिती चौकात ही मुलगी व दोन मुले एका दुचाकीवर बसताना दिसले. याची सर्व माहिती राजुरा पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनी योग्य तपास केला नाही आणि सांगितल्या प्रमाणे संशयित व्यक्तींची योग्य चौकशी केली नाही. गेल्या दहा दिवसांपासुन या मुलीचे वडील पोलीस ठाण्यात चकरा मारीत आहेत. मात्र तपास करणारे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे हे सुट्टीवर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि दुसरे कुणीच माहिती देत नाही. यामुळे बेपत्ता असलेल्या आदिवासी मुलीचे आई - वडील अत्यंत हवालदिल झाले आहेत. मुलीच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण पोलीस गंभीरपणे घेत नसल्याने पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवर या गरीब कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.