Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आंतरराज्यीय गांजा तस्कर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
३० लाख रुपये किमतीच्या ९० किलो गांजासह दोघांना सुमठाना जंगलातून अटक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात धड...

  • ३० लाख रुपये किमतीच्या ९० किलो गांजासह दोघांना सुमठाना जंगलातून अटक
  • स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक पाळत ठेऊन होते. आज गुरुवार दि. १७ ला सकाळच्या सुमारास राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलातून दोन आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून अंदाजे ३० लाख रुपये किमतीचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला. चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी वय ३७, सागर वाल्मिक पाझारे वय २६, दोघेही रा. वरोरा अशी अटकेतील व्यक्तींची नावे आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात यापूर्वी याच परिसरात दोन कारवाया करण्यात आल्या. त्यात पहिल्या कारवाईत ७४ किलो, तर दुसऱ्या कारवाईत ८ किलो गांजा जप्तसुद्धा करण्यात आला आहे. तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे काही दिवसांपूर्वी मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी एएसआय केमेकर, गणेश भोयर, विनोद, प्रमोद, गोपीनाथ यांचे विशेष पथक तयार करून गांजा तस्करांवर पाळत ठेवण्याचे निर्देश दिले. 

त्यानंतर हे पथक मागील चार दिवसांपासून राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलात ठाण मांडून होते. आज सकाळच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीने गांजाची तस्करी केली जात होती. यावेळी या पथकाने वाहने थांबवून तपासणी केली. तेव्हा दुचाकी वाहनावरील दोन चुंगड्यात गांजा आढळून आला. तसेच चारचाकी वाहनातील ट्युबलेस टायरमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला. यावेळी अन्य दोघे सुमारे १० किलो गांजा घेऊन पसार झाले. 

पोलिसांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यानंतर खाडे यांनी घटनास्थळ गाठले. पंचासमोर गांजाचे वजन केले असता सुमारे ९० किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. याची अंदाजे किंमत ३० लाख आहे. सर्व गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली वाहने जप्त केली. राजुरा पोलिस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी, सागर वाल्मिक पाझारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

हा गांजा राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा शहरात वितरित केला जाणार होता, अशी माहिती अटकेतील व्यक्तींनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.

पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात गांजा तस्करी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे. तेलंगणा राज्यातून गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० लाख रुपये किमतीचा ९० किलो गांजा जप्त केला आहे.
- बाळासाहेब खाडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top