मागीलवर्षी मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि संसर्ग शहरात हातपाय पसरू लागला. सुरुवातीला करोनाचे फक्त रुग्ण आढळत होते, मात्र मृत्यू होत नव्हते. त्यानंतरच्या काळात मृत्यूची संख्या अचानक वाढली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर ही संख्या सर्वाधिक होती. करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मनपाचे कर्मचारी परस्परच घाटावर जाऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे. कारण नातेवाइकही पुढे येत नव्हते. दुसरीकडे मनपाचे अनेक कर्मचारीही पॉझिटिव्ह निघत होते. अशा परिस्थितीत, आपण प्रशासनाला मदत करावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व किंग कोब्रा युथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी यांनी मनपाला कोव्हिड मृतांवर अंत्यंसस्काराची परवानगी मागितली. मनपाने ती दिल्यानंतर आपल्या काही सहकाऱ्यांसह त्यांनी ही अंत्यसंस्कार मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांच्या संघटनेतील काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत होतेच. शिवाय, विशेष योगदान तौशिक घुले यांचे होते. कोणत्याही हॉस्पिटलमधून करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे, असा निरोप आला की हे तेथे पोहोचायचे व मृताला घाटावर घेऊन जायचे. तेथे त्याच्या धर्मानुसार कधी अग्नी दिला जायचा तर कधी माती दिली जायची. आजवर रतुडी यांनी असे किमान सहाशे अंत्यसंस्कार केले आहेत. या बदल्यात त्यांनी मनपा प्रशासनाकडून कोणताही मेहनताना घेतला नाही. उलट, गरज असेल तेथे स्वत:च्या खिशातून खर्च केला. मनपाने सुरुवातीला त्यांना अंत्यसंस्कारावेळी घालण्यात येणाऱ्या किट पुरविल्या. नंतर मात्र रतुडी यांनी स्वत:च्याच खर्चाने किट घेतल्या. एका किटद्वारे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केला जायचा. मात्र, एकाचवेळी अनेक मृतदेह असले तर ती एकच किट वापरली जायची. मानेवाडा घाट येथे एकदा एकाच दिवशी १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे ते सांगतात. हे सर्व करनाता स्वत:ची आणि घरी असलेल्या कुटुंबाची काळजीही त्यांना घ्यायची होती. या कार्यात त्यांना कुटुंबानेही पूर्ण सहकार्य केले. महापौरांनी त्यांचा सत्कारप्रसंगी विशेष शब्दांत गौरव केला. अलीकडेच पोलिस विभागातर्फेही रतुडी यांच्या पूर्ण कुटुंबाचाच विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. नागपूर शहर करोनामुक्त होत नाही तोवर ही सेवा सुरूच राहणार असल्याचे रतुडी यांनी सांगितले.
सहाशे बाधितांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार
नागपूर -
बाजूला एखादा करोनाबाधित आहे, असे समजले तरी त्याच्यापासून शक्य तितके लांब राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतात. असे असताना गेले वर्षभर कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्यांवर स्वखर्चाने त्यांनी अंत्यसंस्कार करण्याचे व्रत घेतले. त्या अरविंदकुमार रतुडी यांचा महापालिकेच्या वर्धापनदिना निमित्त महापौर दयाशंकर तिवारी यांनी विशेष गौरव केला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.