- नेमके कोणते निर्बंध आहेत जाणून घ्या
- नागपूरमध्ये करोनाचा धोका
- स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आधीच लागू करण्यात आलेले कोविड निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय
- वाचा सविस्तर....
नागपूर -
करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आणि पुढे होळी सण असल्याने करोना नियंत्रणात आणण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत, मात्र या निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहार विस्कळित होऊ नये याचीही योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊन लावूनही करोनाचे आकडे काही कमी झाले नाहीत. ३ हजारांच्या पार गेलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. व्यापाऱ्यांसोबतही याबाबत चर्चा करण्यात आली. ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले.
दिल्लीच्या अहवालाची प्रतीक्षा
नागपुरात करोनाचे रुग्ण एवढ्या झपाट्याने का वाढत आहेत, हा नवा स्ट्रेन तर नाही याची खात्री करण्यासाठी दिल्लीला नमुने पाठविण्यात आले होते. म्युटेशन झाल्यानेच हा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याची चर्चा वैदयकीय क्षेत्रात होती. मात्र अद्याप अहवाल प्राप्त व्हायचा असून त्यानंतरच याबाबत स्पष्ट सांगता येईल, असे राऊत म्हणाले.
लसीकरणावर परिणाम नाही
निर्बंध कडक करण्यात आले असले तरी लसीकरणावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. जिल्ह्यात ६ लाख ८७ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांनी लॉकडाऊन या शब्दाचा उल्लेख केला नाही मात्र निर्बंध कायम राहणार, असे सांगितले. निर्बंध वाढवत असताना जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, अशी ग्वाही राऊत यांनी दिली. करोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाशिवाय टेस्टिंग आणि ट्रेसिंगही वाढवले जात आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे
- भाजीपाला, धान्य दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार.
- ऑनलाइन रेस्टॉरंट सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार.
- लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार.
- नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.
- ग्रामीणमधील जिथे रुग्णसंख्या कमी आहे, अशा उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यात दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू राहणार आहेत. इतर तालुक्यात दुकाने सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहतील.
संपूर्ण लॉकडाऊनवर हरकत
सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनला हरकत घेतली. संपूर्ण लॉकडाऊन केल्यास गरिबांचं मोठं नुकसान होतं, अनेकांचे रोजगार बुडतात, असा मुद्दा फडणवीस यांनी मांडला होता. त्याचवेळी नियम कडक केले जावेत, असेही सूचवले होते. त्यावर पालकमंत्री राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.