यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, आयुक्त राजेश मोहीते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, अधिष्ठाता डॉ. एस.एन.मोरे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले की, कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वतःहून स्वतःची व स्वतः च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी आणि शारीरिक तापमान तपासणार आहेत. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोनाचे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे याचाही यात समावेश आहे. मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीत साधारणपणे दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात टप्याटप्याने ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून यात सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. संशयीतांची कोविड -19 चाचणी करण्यात येणार आहे. कोविड -19 बाबत प्रत्येक नागरिकाला शिक्षित करणे तसेच संशयीत नागरिकांना त्वरित शोधणे व त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु करणे जेणेकरून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करता येईल. हा यामागील उद्देश असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
या मोहिमेदरम्यान नागरिकांना कोवीड नियंत्रणासाठी शिकणे आजची गरज असून यासाठी काही नियम आणि मार्गदर्शक सूचना नागरिकांनी अंगीकारणे आवश्यक आहे. कुटुंब म्हणून आवश्यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी. कोरोनापासून बचावासाठी आवश्यक असलेली पथ्य पाळताना अनावधानाने काही चुक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावीत. असे वडेट्टीवार म्हणाले. नागरिकांनी आपापसात किमान 2 मीटरचे सुरक्षित अंतर ठेवावे, मुखपटी अर्थात फेसमास्कचा कटाक्षाने वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावे, तसेच निर्जंतुकीकरण द्राव्याचा योग्यरीत्या वापर करावा हि त्रिसुत्री प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. याव्यतिरिक्त दैनंदिन जीवनात वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, सोसायटी किंवा वसाहतीमध्ये, दुकाने, मंड्या, मॉल्स मध्ये खरेदीला जाताना, प्रवास करताना या सर्व बाबी जिवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे असे वडेट्टीवार म्हणाले .
जोपर्यंत कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही तोपर्यंत या सर्व बाबींचे पालन करून या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असून जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नाना सहकार्य करा असे आवाहन वडेट्टीवार यांनी यावेळी केले.
माझे कुटुंब,माझी जबाबदारी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीसाठी आशा सेविकांना थर्मल स्क्रिनींग, पल्स ऑक्सीमीटर, सॅनीटायजर हे आरोग्य तपासणी साहित्य पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.