बल्लारशाह–नागपूर रेल्वेमार्गावरील घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. १३ जुलै २०२६) -
११ जुलै रोजी बल्लारशाह ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या १२६२५ केरळ एक्सप्रेसमध्ये वरिष्ठ तिकीट परीक्षक अश्विनी कुमार लांजेवार यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा झेडआरयूसीसी (ZRUCC) मध्य रेल्वे, मुंबईचे सदस्य तथा नमो पॅसेंजर वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय दुबे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच अशा घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
अजय दुबे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, वरिष्ठ तिकीट परीक्षक अश्विनी कुमार लांजेवार यांच्यावर झालेली मारहाण अत्यंत गंभीर असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील आरोपी अवैध वेंडर, त्याचा मालक तसेच अशा अवैध प्रकारांना संरक्षण देणारे जबाबदार रेल्वे सुरक्षा दल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि वाणिज्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
![]() |
| AI Image |
अजय दुबे यांनी पत्रात म्हटले आहे की, तिकीट तपासणी अधिकाऱ्यांवर प्रवासी तसेच अवैध वेंडर्सकडून मारहाण आणि गैरवर्तनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी कर्तव्य बजावणे दिवसेंदिवस अधिक धोकादायक आणि कठीण होत चालले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, टीटीई कर्मचारी जीवाची पर्वा न करता सातत्याने प्रामाणिकपणे काम करत असून त्यांनी रेल्वेच्या महसुलात उल्लेखनीय वाढ करण्याबरोबरच प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवणे आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा मिळणे आवश्यक असून ११ जुलैच्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
अजय दुबे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. त्यामध्ये धावत्या रेल्वेगाड्यांमधील अवैध वेंडर्सवर तात्काळ बंदी घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक, नवी दिल्ली यांना आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दल (RPF) अथवा महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या दोन सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून तिकीट तपासणी अधिकारी निर्भयपणे व निर्विघ्नपणे आपले कर्तव्य पार पाडू शकतील, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अजय दुबे यांनी रेल्वे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असे आवाहन केले आहे.
#KeralaExpress #IndianRailways #TTE #AshwiniKumarLanjewar #RailwaySafety #RailwayNews #AjayDubey #AshwiniVaishnaw #RPF #GRP #Ballarshah #Nagpur #CentralRailway #RailwayEmployees #TrainNews #MaharashtraNews #BreakingNews #PassengerSafety #RailwaySecurity #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.