आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 28 ऑक्टोबर 2025) -
छठ पूजेच्या निमित्ताने आज सकाळी बल्लारपूर-राजुरा मार्गावरील वर्धा नदीच्या घाटावर श्रद्धाळूंनी अर्घ्य अर्पण केल्यानंतर नौकाविहाराचा आनंद घेत असताना अचानक एक लाकडी डोंगा उलटला. या डोंग्यात सुमारे दहा श्रद्धाळू बसलेले होते. अपघाताच्या क्षणी नदीकाठावर उपस्थित असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर काही श्रद्धाळू डोंग्यावर बसून नदीत फिरत होते. अचानक डोंग्याने तोल गमावल्याने तो पाण्यात उलटला. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी तातडीने नदीत उडी घेत सर्वांना बाहेर काढले. या घटनेत दोन मुले बेशुद्ध झाली होती. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असून ते दोघेही आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
छठ पूजेचा जल्लोष संपूर्ण घाटावर पाहायला मिळत होता. काल संध्याकाळी पाण्याची पातळी कमी होती, परंतु आज सकाळी अर्घ्याच्या वेळी पाणी काहीसे वाढले होते. महिलांनी चिखल व पाण्यात उभे राहून निर्जला उपवास पूर्ण केला. पूजा संपल्यानंतर काही जण डोंग्यावर बसले असताना हा प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित महिलांनी सांगितले की, “छठ माई ही मातृत्वाची प्रतीक आहे. ती कोणत्याही आईचे लेकरं हिरावून घेत नाही. तिच्या कृपेनेच आज सर्व श्रद्धाळू वाचले.”
राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी घटनेची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली. राजुरा पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, उपस्थित श्रद्धाळूंनी प्रशासनाकडे वर्धा नदीच्या तटावर सुरक्षित पायरीवाला घाट बांधून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील.
#ChhathPuja #WardhaRiver #BoatCapsize #RajuraNews #DevotionAndFaith #ChandrapurUpdates #ChhathFestival #MiracleEscape #RiverSafety #MaharashtraNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.