सुकडपल्ली ग्रामस्थांचा संताप; खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त
आमचा विदर्भ - (प्रतिनिधी)
राजुरा (दि. ०७ जुलै २०२५) –
राजुरा तालुक्यातील सुकडपल्ली हे गाव राजुरा पासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर असले तरी तेथील नागरिक सध्या खराब रस्त्यामुळे गंभीर त्रास सहन करत आहेत. विशेषतः देवाडा - गडचांदूर मुख्य रस्त्यावरील टी-पॉईंट पासून सुकडपल्लीपर्यंतचा सुमारे ३ किमीचा अंतर्गत रस्ता पूर्णतः उखडलेला असून, जागोजागी मोठाले खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे रस्ता अदृश्य होतो आणि यामुळे दुचाकीस्वारांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना गंभीर दुखापती झाल्याची चर्चा सुरू आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी गावातील सुशिक्षित युवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमाने या रस्त्याचे व्हिडीओ व फोटो शेअर करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या संदर्भात स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सांगितले की, "हा रस्ता काँग्रेसच्या सरकारच्या काळात, म्हणजेच सन २००० मध्ये बनवण्यात आला होता. त्यानंतर आजतागायत या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती, डागडुजी किंवा देखभाल करण्यात आलेली नाही." त्यांनी असेही नमूद केले की, "दररोज आम्हाला देवाडा व राजुरा येथे ये-जा करावे लागते. खराब रस्त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे." तसेच वाघमारे यांनी शासनाला आवाहन करताना म्हटले, "भाजप सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर सुकडपल्ली रस्त्याची दुरुस्ती करून आम्हाला दिलासा द्यावा. रोजच्या प्रवासात जीव धोक्यात घालावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलावी."
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.