''कोळसा खाणींतील कंत्राटी व्यवस्थेला विरोध''
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १४ मे २०२५) -
वेकोली अंतर्गत माती उत्खनन कंत्राट कंपनी स्थानिक कामगारांना बाजूला करून आणि इतर राज्यातील कामगारांना कमी वेतनात जास्त काम करायला लावून स्थानिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप कंत्राटी कामगार रोशन हरबडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. १५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून नागपूर येथील वेकोली सीजीएम कार्यालयापर्यंत पैदल मार्च काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत २०० ते २५० कामगार सहभागी होतील असा अंदाज आहे.
रोशन हरबडे यांनी सांगितले की, गेल्या १० ते १५ वर्षांपासून विविध भागात वेकोली अंतर्गत माती उत्खनन कंत्राट कंपनीत कामगार कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या कालावधीत वेकोलीमध्ये कायमस्वरूपी कामगारांची भरती थांबवून ९०% कामकाज कंत्राटी कंपन्यांना देण्यात आले आहे. परंतु, स्थानिक कामगारांना नोकरी न देता बाहेरील कामगारांना कामावर ठेवण्यात येत आहे. वेकोलीने कोळसा खाणीसाठी अनेक गावांमधील शेतजमिनी अधिग्रहित केल्या. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे स्थलांतर झाले आणि पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. प्रदूषण, जड वाहतूक, आणि तापमान वाढ यासारख्या समस्यांना स्थानिक नागरिक तोंड देत आहेत.
यावेळी रोशन हरबडे यांच्यासह अजय गजभिये, मो. अली शेख, मनोज भगत, श्रीनिवास येडलावार, श्रीनिवास करंगला, शरद कस्तुरी हे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, कामगारांना ८ तासांऐवजी १२ तास काम करण्यास भाग पाडले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रादेशिक महाव्यवस्थापकांकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. १५ मे रोजीची पदयात्रा ही वेकोली प्रशासनाला कंत्राटी कामगारांच्या समस्या समजावून देण्याचा प्रयत्न आहे. ही यात्रा स्थानिक कामगारांच्या न्यायासाठीच्या संघर्षाचा एक भाग आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.