गुवाहटीमध्ये शिवसेनेचे बंडखोर दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
मुंबई -
गुवाहटीमध्ये शिवसेना बंडखोर दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद झाली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू असून, त्यांनी दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड केली आहे. आमच्याकडे बहुमत आहे, आमचा पक्ष शिवसेना; असे म्हणत बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा सांगण्यात आला आहे. तर आम्ही संजय राऊत यांना गंभीरपणे घेत नाही असे म्हणत त्यांनी राऊतांवर तोफ डागली आहे. आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा नकोय, तर केवळ भाजपसोबत सरकार हवे आहे, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
शिवसेना म्हणजे आम्हीच
आम्हीच शिवसेना आहोत. आम्ही विधिमंडळात निवडून आलोत. आम्ही कशाला आमचाच पाठिंबा काढू. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांना कुणीतरी काढण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेनेला कोणीही हायजॅक केले नाही. आम्ही शिवसेनेच्या विचाराचे, बाळासाहेबांच्या विचाराचे. आमचा पक्ष, आमच्या आमदारांना पराभूत करण्याचा आणि हायजॅक करण्याचा प्रयत्न केला गेला.
लोकशाहीची हत्या नको
पक्षांतरबंदी कायदा लागू होऊच शकत नाही. ओढून-तोडून कायदा लागू करणे लोकशाहीची हत्या आहे. आम्ही महाराष्ट्रात आले पाहिजे, पण राऊत म्हणतात रस्त्यावर उतरणार. अशावेळेला आठवण करून द्यायचीय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. तेव्हा कोणाच्याही बद्दल आकस न बाळगता कर्तव्य पार पाडावे. कायद्याचे पालन पार पाडावे.
आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. मात्र, आम्ही शिवसेना आहोत. आम्ही अजून कसलाही दावा केला नाही. आम्ही इतकेच म्हणतोय, आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. शिवसेनेत राहणार आहोत. सोळा ते सतरापेक्षा जास्त लोक त्यांच्याकडे नाहीत. त्यांच्याकडे बहुमत नाही. माझी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, आज जे महाराष्ट्रात दंगे सुरू आहेत. त्यांनी एक आवाहन केले, तर ते बंद होतील. हे दंगे त्यांनी थांबवावेत, असे अवाहन दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
गैरसमज नको म्हणून चर्चा
एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलंय की अधिकृतपणे तुम्ही माध्यमांशी संवाद साधा. एक गैरसमज असा आहे की, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो आहोत. पण आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. सरकार चांगले चालावे यासाठी आम्ही पक्षप्रमुखांना अनेकदा विनंती केली, कित्येक दिवस आम्ही उद्धव ठाकरेंना हे सांगत होतो. आमची अजूनही समजूत आहे की, ते ऐकतील.
यामागे कुणीही नाही
आम्हाला कोणीही असे सांगितले नाही की, असे तुम्ही करा. आम्हाला एकनाथ शिंदे हे स्वत: उद्धव ठाकरेंनी नेते म्हणून दिले आहेत. दोन तृतीयांश बहुमताचा जो मुद्दा आहे तो घटनात्मक आहे. आपलं वेगळे म्हणणे मांडण्यासाठी ते लागते. ते बहुमत आमच्याकडे आहे. 55 आमदारांचा नेता बदलायचा असेल तर तो 16 लोकांना बदलता येत नाही. जो काही निर्णय उपाध्यक्ष झिरवाळांनी दिला आहे त्याला आम्ही कोर्टात चॅलेंज देणार आहोत.
आम्ही पक्षाचे वेगळं नाव मागितले नाही
तुम्हाला जर पक्षाने विधानसभेसाठी व्हिप काढला तर आणि तुम्ही अबसेंट राहिलात तर तो व्हिप लागू होतो. असा बाहेर लागू होत नाही. आमच्यापैकीच एक जण गटनेता होतो, प्रतोद होतो, अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो. आम्ही कुणीही पक्ष सोडलेला नाही, जी रस्त्यावर उतरण्याची भाषा केली जात आहे, ती अत्यंत चुकीची आहे. माझे तमात शिवसैनिकांना आवाहन आहे की, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, बाळासाहेबांचे विचार पुढे नेले जातील.
नोटीसीचे कारण चुकीचे
आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. आम्हाला जी 48 तासांची नोटीस बजावली आता शनिवार, रविवार आहे. एवढी कोणतीही इमर्जन्सी नव्हती. त्यांनी नियमाप्रमाणे एका आठवड्याची मुदत द्यायला हवी होती. यासाठी आम्ही उपाध्यक्षांना विनंती करू. मुळात या कारणासाठी अशी नोटीस काढता येणार नाही. तरीही आम्ही त्यांच्याजवळ आमचे म्हणणे रीतसर मांडू. असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न
जिथे शिवसेना दोन नंबरला होती, तिथे राष्ट्रवादीला ताकद दिली जात होती, म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी आमचा आग्रह होता. त्यांनी तसे आश्वासन द्यायला पाहिजे होते की, तुमच्या उमेदवाराला धक्का लागणार नाही. उद्धव ठाकरे पुढेही आमचे ऐकतील ही आमची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल खूप प्रेम आहे. म्हणून शिवसेना आणि भाजपने एकत्र आले पाहिजे अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली. शिवसैनिकांना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंकडून खूप अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण झाल्या नाही, असा आरोप दीपक केसरकरांनी केला आहे. मविआत शिवसेनेला महत्त्व नाही, असे केसरकरांनी म्हटले आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादीकडे हात पसरावे लागतात
सगळे चांगले खाते काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे, आमच्याकडे एकही चांगले खाते नाही. आमची कामं घेऊन गेल्यावर त्यांच्यापुढे हात पसरावा लागतो. हा माणूस मुख्यमंत्र्यांचा आहे, शिवसेनेचा आहे तर त्यांनी तेवढे व्हेटेज द्यायला पाहिजे होते, पण दिले गेले नाही. ही ठिणगी राज्यसभेपासून पडली, राज्यसभेत जी मतं फुटली, ती ना शिवसेनेची होती ना शिवसेनेला सपोर्ट करणाऱ्यांची होती. त्या फुटलेल्या मतांची मीमांसा व्हायला पाहिजे होती.
आमचा खर्च करण्यास आम्ही सक्षम
प्रत्येक आमदाराला चांगला पगार आहे, यामुळे तो स्वत:चा खर्च करू शकतो. आम्ही पैसे भरून येथे राहतो, आमचा खर्च कुणीही उचलत नाही. भाजप आमचा खर्च का करेल? तुम्ही भाजपचे नाव का जोडता? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही कुठल्याही पक्षात उभे राहून निवडून आलेलो आहोत. उमेदवाराचे गुडविल, अधिक पक्षाची मते. आज तरी महाराष्ट्राच्या विधानसभेत असे 70 ते 80 जण आहेत ते कुठल्याही पक्षातून निवडून येतात. असे लोक असतात. संजय राऊतांवर रोष असण्याचा प्रश्न नाही. त्यांच्याबद्दल मला आजही आदर आहे. आमचा संबंध भागाच्या विकासाशी येतो. असे म्हणत केसरकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
केसरकर साहेब मग हा खेळ कशाला करताय.
उत्तर द्याहटवा