- कोरोना काळात गोवरी गावात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची थोपटली पाठ
- कोरोनामुक्त गावातील सरंपचांनी केले अनुभव कथन
चंद्रपूर -
कोरोनाचे संकट हे एका महायुध्दाप्रमाणे आहे. या लढ्यात शासन, प्रशासन, सामाजिक संघटना, नागरिक सर्व एकजुटीने लढत आहे. जिल्ह्यातील 1200 गावांपैकी 313 गावे सुरवातीपासून कोरोनामुक्त ठेवण्यास प्रशासनाला यश आले असून सद्यस्थितीत बहुतांश तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले उपक्रम राबविले असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी दिली.
कोरोनाकाळात खनीज विकास निधीचा सर्वात चांगला उपयोग चंद्रपूर जिल्ह्याने केला, असे सांगून उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, चंद्रपूरचा हा आदर्श इतरही जिल्ह्यांनी घ्यावा. तसेच जनजागृतीकरीता गावपातळीवर लाऊडस्पीकर सिस्टीमचा चांगला उपयोग करण्यात आला. गावपातळीवर व्हॉट्सॲप ग्रुप करणे, रोजगार हमी योजनेच्या कामावरील नागरिकांची ॲन्टीजेन टेस्ट करणे, ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोनाविषयक उपाययोजनेसाठी उपक्रम राबविणे आदी बाबी करण्यात आल्या आहेत. आपले गाव, आपले शहर, आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याची कार्यपध्दती वेगवेगळी राहिली आहे. या काळात सर्वांनाच खूप काम करावे लागले व आजही करावे लागत आहे.
यावेळी राजुरा तालुक्यातील गोवरी येथील सरपंच आशा बबन उरकुडे, मुल तालुक्यातील राजगड येथील सरपंच चंदू पाटील मारकवार, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील सरपंच नयन जांभुळे, दुर्गापूर येथील सरपंच पूजा मानकर आदींनी आपापल्या गावात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथे कोरोनाचे १०२ बाधित निघाले होते. तेव्हा गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच यांनी लोकांच्या आरोग्याची गंभीर दाखल घेत तातडीने उपाययोजना करण्यात सुरुवात केली. गावाची सीमा सील करून आरोग्या विभागाच्या मदतीने गावातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. गरजुंना या काळात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा, आयसोलेशन मध्ये असणाऱ्यांना दररोज फळ वाटप, संपूर्ण गाव सॅनिटायझर, धूर फवारणी प्रशासकीय स्तरावर अधिकाऱ्यांना भेटून उपाययोजना आखण्यात आल्या. यात आशाताईंना आरोग्य विभागाचे भरभरून सहकार्य मिळाले. यामुळे १०२ बाधित निघाल्यानंतरही त्यातील एकही बाधित दगावला नाही व अवघ्या १५-२० दिवसात संपूर्ण गोवरी गाव कोरोनमुक्त झाले. आशाताईंचे कार्य पाहून
येथील सरपंच आशा बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात निलमताई गोऱ्हे यांनी कोरोना काळात गोवरी गावात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची पाठ थोपटली व कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या कार्यांचे भरभरून कौतुक केले.
निलमताई गोऱ्हे यांनी गोवरी व इतर गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे कौतुक करताच गावात आनंद व्यक्त करण्यात आला तसेच प्रशासनाने पारितोषिक ठरविलेल्या यादीत गावाचे नांव येईल अशी "आशा" गावातील हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, प्रशासकीय अधिकारी, शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांतदादा कदम, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, शिवसेना राजुरा विधानसभा समन्वयक बबनभाऊ उरकुडे, ग्रामसेवक संजय तुराडे, ग्राम पंचायत सदस्य नीलम कोसूरकर, नीलिमा देवाळकर, माजी ग्रापं सदस्य अमोल कोसुरकर, तुफान गिरी, तेजस पाचभाई यांच्यासह कोरोनामुक्त गावातील सरपंच, आशा स्वयंसेविका व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.












टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.