- गोवरी-चिंचोली येथील पुरपीडित संतप्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली आपली व्यथा
- वेकोलिने नाला वळविल्यामुळे ३५० एकरच्या जवळपास शेती आली होती पाण्याखाली
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजूरा -
राजुरा तालुक्यातील गोवरी, चिंचोली, माथरा या गावाजवळून वाहणार्या चार ओढ्याचे नैसर्गिक प्रवाह बदलून त्यांना एकाच छोट्या ओढ्यात प्रवाहित केल्याने आणि खाणी भोवती माती टाकून उंच भाग केल्याने पाऊस आल्यानंतर या नाल्यातील संपूर्ण पाणी शेतकर्यांच्या शेतात येऊन सुमारे ३५० एकर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र वेकोलिने कसलीही नुकसानभरपाई दिली नाही. ओढा डायव्हर्सन करतांना वेकोलिने कायदाभंग केला असून वेकोलिच्या अधिकार्यांवर कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गोवरी, पोवनी व माथरा येथील आपद्ग्रस्त शेतकर्यांनी पत्रपरिषदेत केली. वेकोलिने नष्ट झालेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी आणि वेकोलिच्या अधिकार्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आता आमची जमीन अधिग्रहित करावी, अशीही मागणी यावेळी शेतकर्यांनी केली आहे.
आज या शेतकर्यांनी राजुरा तहसिलदार यांना निवेदन देऊन या भागातील चार मोठ्या ओढ्याचे वळणीकरण करताना वेकोलिने कायदयातील तरतुदीचे उल्लंघन करून खोदकाम केले, असा आरोप केला आहे. गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली या गावांच्या परिसरात वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाण परिसरात नैसगीकपणे वाहणारे अनेक नाले आहेत. वेकोलीने यापुर्वी दोन ओढ्याचे खोदकाम करून नैसर्गीकपणे वाहणाऱ्या नाल्यांना कृत्रीमपणे गोवरी ओढ्याला जोडले. यामुळे नैसर्गीकपणे वापरणाऱ्या पाण्याचा प्रवाह बदलून बॅक वॉटर चा फटका गोवरी व परिसरातील गावांना व शेतीना बसत आहे. आता वेकोलीने पोवनी खदान एक व दोन करीता साखरी नाल्याचा नैसर्गिकपणे वाहणारा प्रवाह बेकायदेशिरपणे बदलवून गोवरी नाल्याला जोडल्याने बॅक वॉटरचा फटका गोवरी गावाला बसला. त्यामुळे दिनांक 22 व 23 जुलैला गोवरी गावातील अनेक घरांत पाणी घुसून गावकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच गोवरी परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतपिकाचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्यांनी नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करत वेकोलि अधिकाऱ्यांना गावात आणून घेराव केला होता. शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांनी त्यावेळी परिस्थिती उत्तमरीत्या हाताळत वेकोलिकडून नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन लिहून घेतले होते. मात्र वेकोलि कडुन अजूनही नुकसान भरपाई देण्यात आली नाही.
यापुर्वी सन २०१५-१६ मध्ये सुध्दा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हा तत्कालीन राजुरा येथील उपविभागीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांना वेकोलिला नुकसान भरपाई देण्यास सांगीतले होते. परंतु आजपर्यन्त सुद्धा वेकोलीकडुन शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. वेकोलीच्या बेकायदेशिर नाला वळतीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व गोवरी गावातील लोकांच्या झालेल्या नुकसानीचा स्वतंत्र पंचनामा करून वेकोलीने शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी तसेच प्रकल्पाच्या आजुबाजूला असलेल्या शेतजमीनी त्वरित अधिग्रहीत करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई व रोजगार दयावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत केली. यावेळी अँड. मारोती कुरवटकर आणि गोवरी येथील शंकर बोढे, प्रभाकर बोढे, सुधाकर पाचभाई, किशोर लोहे, रूपेश पाचभाई, अरुण पाचभाई, विलास लोहे, सुधाकर ढुमने, श्रीरंग उरकुडे, गुरुदास अहीरकर, लहु चहारे, सुनील पाचभाई, पंढरी बोढे यांच्यासह गोवरी, चिंचोली व माथरा येथील शेतकरी उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.