- क्षुल्लक कारणावरून भांडण
- गडचांदूर पोलीसांनी गुन्हा दाखल करून तिघांना केली अटक
गडचांदुर -
कोरपना तालुक्यातील आवारपूर ग्रामपंचायत हद्दीतील शेतशिवारात एका शेतकऱ्याला शेजारच्या शेतकऱ्यांनी क्षुल्लक कारणावरून विळ्याने डोक्यावर व हातावर वार करून जखमी केल्याची घटना ३० जुलै रोजी सायंकाळी अंदाजे ६ च्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन गडचांदूर पोलीसांनी तीन जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अजीत नामदेव बोधाने वय अंदाजे ४५ रा. आवाळपूर असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून अविनाश बबन चौधरी, आकाश नामदेव घोटकर, विट्ठल तुळशीराम चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून यातील अविनाश हा आवाळपूर ग्रा.पं. चा माजी उपसरपंच आहे. एका आर्थिक प्रकरणात यांनी "जेल की हवा" सुद्धा खाल्ली आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार अजीत बोधाने हा आपल्या शेतात काम करीत असताना शेताशेजारी असलेल्या अविनाश सोबत आकाश आणि विट्ठल दुचाकीने आले. अजीतच्या शेताच्या कडेला दुचाकी ठेवून हे तिघेजण अजीतच्या शेतातील सोयाबीनच्या उभ्या पिकातून चालत चालत जात होते. त्यावेळी "तुला सेपरेट रस्ता असताना तु माझ्या शेतातून का जातो, माझ्या सोयाबीनचे नुकसान होते, तु रोडने जात जा" असे अजीत यांनी सांगितले असता अविनाशनी शिवीगाळ सुरू केली. "तु काय करतोच मी बघतो" असे म्हणत अजीतच्या अंगावर गेला. त्यावेळी सोबत असलेले विट्ठल व आकाश यांनीही शिवीगाळ करत मारायला सुरुवात केली. यानंतर दोघांनी अजीतला पकडले व अविनाश यांनी त्याच्याकडील विळा काढला आणि अजीतच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या मनगटावर वार करून जखमी केले. रक्तस्तराव पाहुन या तिघांनी तेथून पळ काढला. त्यानंतर बाजूच्या शेतातील दिलीप दुधकोर नामक व्यक्तीने त्याच्या दुचाकीवर जखमी अवस्थेत अजीतला गडचांदूर पोलीस स्टेशन येथे आणले. पोलीसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत तक्रार नोंदवून अजीतला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. पोलिसांनी आरोपी अविनाश, आकाश व विट्ठल विरूध्द ३२३, ३२४, ५०४,५०६, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.