- अनलॉकचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार
- 'त्या' घोषणेवर वडेट्टीवारची गोची
- अनलॉकबाबत घोषणा करून मंत्रीजी फसले
- मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्टीकरणामुळे झाली गोची
- नागपुरात पोहचताच केली सारवासारव
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत उद्यापासून अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा केली होती. कोविड पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे व हे जिल्हे पाच टप्प्यांत लॉकडाऊनमुक्त होतील, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले होते. त्यांनी निर्बंध कसे शिथील होणार याचा संपूर्ण तपशीलही दिला होता. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण आलं आणि वडेट्टीवार यांची गोची झाली. 'राज्यात निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे', असे सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विजय वडेट्टीवार हे नागपूरला रवाना झाले होते. दरम्यानच्या काळात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळाबाहेर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांची गर्दी झाली होती. राज्याचा अनलॉक प्लान जाहीर करणाऱ्या वडेट्टीवार यांनी यावेळी सारवासारव करत मोजकीच प्रतिक्रिया दिली. 'महाराष्ट्र अनलॉकचा येथे प्रश्नच उद्भवत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हानिहाय पाच स्तरीय अनलॉक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिलेली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांत हा आदेश जारी होईल', असे वडेट्टीवार म्हणाले. उद्यापासून १८ जिल्हे अनलॉक होणार का, असे विचारले असता त्यावर काहीच प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही.
या काम चलावु सरकार मुळे जनतेला अशा प्रश्न पडतोय कि मुख्यमंत्री कोण आहे ते समजून येत नाही,,,,,,
उत्तर द्याहटवा