सीमा भागातील नागरिकांचे संकट कायम: १४ गावांचे सीमांकन रखडलेच!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ जून २०२५) -
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकन व भुमी अभिलेख तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती, ज्यामध्ये या गावांचे सीमांकन करून त्यांचे भूमी अभिलेख तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना प्रस्ताव अवलोकनार्थ सादर करण्यात आला होता. त्यानंतर महसूल विभागाच्या अप्पर सचिवांनी जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख पुणे यांना पत्र दिले.
मात्र या निर्णयाला जवळपास ३ वर्षांचा कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. भूमी अभिलेख विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये सीमांकनाचा प्राथमिक डेटा बंदिस्त असला तरी पुढील कोणतेही नकाशे, आकारबंद, इजाफा इत्यादी तयार झालेले नाहीत. या विषयावर राजुऱ्याचे माजी आमदार व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करून तात्काळ या गावांचे सीमांकन करून भुमी अभिलेख तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची मागणी केली आहे. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची मालमत्ता, जमीन हक्क, शासकीय लाभ आदींबाबत अनिश्चितता असून, प्रशासनाच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे त्यांचा रोजचा जीवनक्रम अडचणीत आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.