कृषी पंपांसाठी विशेषबाब म्हणून विद्युत जोडणी द्या
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ जून २०२५) -
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या अडचणी लक्षात घेता, कृषी पंपांसाठी विशेषबाब म्हणून तातडीने विद्युत जोडणी द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा प्रमुख स्रोत कृषी पंप आहे. मात्र ‘बळीराजा कृषी विज माफी योजना’ लागू झाल्यापासून कृषी पंपांना नवीन विद्युत जोडण्या थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूरसारख्या पाणथळ भागात शेतीचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही आजपर्यंत विज जोडणी मिळालेली नाही.
भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. त्यानंतर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे थेट पाठपुरावा करत शेतकऱ्यांची बाजू मांडली. चंद्रपूर जिल्ह्यात जमिनीखालील पाण्याची पातळी १५० फूटांपर्यंत असल्याने सौरपंप अनुत्पादक ठरतात. त्यामुळे पारंपरिक विद्युत पंपच गरजेचे आहेत. यामुळे विशेष बाब म्हणून कृषी पंपांसाठी विज जोडणी द्यावी, अशी स्पष्ट व ठाम मागणी त्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.