आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर / सावली (दि. 14 मे 2025) -
शुल्लक वादातून एका तरुणाला चाकूने सपासप वार करून जाग्यावरच ठार केल्याची घटना मंगळवारी (दि. 13) रात्री 9 वाजता केरोडा (मानकापूर) हेटी येथील आंबेडकर चौकात घडली. या घटनेत समीर हरीदास खंडारे (32) या तरुणाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर खंडारे हा मजुरीचे काम करीत होता. 13 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता आंबेडकर चौकात रामदास कन्नाके यांच्या दुकानाजवळ समीर, गिरीधर वालदे व त्याचा मुलगा अभय गिरीधर वालदे हे जोरजोरात बोलत होते. त्यातून वाद निर्माण झाला आणि रात्री 9.30 वाजता वाद विकोपाला जाऊन समीरवर चाकूने सपासप वार करण्यात आले. समीर जागीच ठार झाला. अमित शेट्टे या व्यक्तीने मृतकाच्या मोठ्या भावाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन त्याने पाहिले की समीर रक्ताने माखलेल्या स्थितीत पडला होता. त्याच्या शर्ट आणि पॅन्टवर चाकूचे वार असल्याचे स्पष्ट दिसत होते. मृतकाच्या भावाने तत्काळ सावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सावली पोलिसांनी तक्रारीची नोंद करून तपास सुरू केला. गिरीधर वालदे व त्याचा मुलगा अभय वालदे हे दुचाकीवरून व्याहाड येथे गेले व साईनाथ शेडमाके आणि पियुष लाटेलवार या मित्रांना बोलावून समीरला चाकूने भोसकले, अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. SDPO सावली यांनी श्वान पथक पाचारण केले व आरोपींच्या मोबाईल लोकेशनद्वारे गिरीधर वालदे (50), अभय वालदे (23), विधी संघर्ष बालक साहिल शेडमाके (16) आणि पियुष लाटेलवार (16) या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.