Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: तंटामुक्त समितीच्या बैठकीतच झाला तंटा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तंटा मिटविण्यासाठी यावे लागले पोलिसांना तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत प्रवेशद्वार उघडण्याच्या वादावरून दोन गटात हाणामारी निवडण...
तंटा मिटविण्यासाठी यावे लागले पोलिसांना
तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत प्रवेशद्वार उघडण्याच्या वादावरून दोन गटात हाणामारी
निवडणुकीमध्ये भास्कर लोहबडे यांची अध्यक्षपदी वर्णी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
        महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत अस्तित्वात असणाऱ्या तंटय़ांबरोबर नव्याने निर्माण झालेले तंटे मिटविण्याची जबाबदारी तंटामुक्त गाव समितीवर असते, गावात तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून समिती प्रतिबंधात्मक उपाय करते. मात्र तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत प्रवेशद्वार उघडण्याच्या वादावरून वाद झाला आणि वादाचे पाडसात दोन गटात हाणामारीत झाले आणि तंटा मिटविण्यासाठी पोलिसांना बोलाविण्याची नामुष्की तंटामुक्त समितीवरच आली. 

        कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत नांदा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल मागील काही महिन्यापूर्वीच संपुष्टात आला. नवीन अध्यक्ष पदाच्या निवडीकरिता तसेच विविध विषयांना घेऊन सांस्कृतिक भवन नांदा फाटा येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली. मात्र कोरम अभावी ही सभा स्थगित करून नव्याने गुरुवार दिनांक 17 नोव्हेंबरला ही सभा आयोजित करण्यात आली. यावेळी गावातील राजकीय समीकरणाप्रमाणे एका गटाच्या बाजूने प्रफुल बोढाले व दुसऱ्या गटाकडून भास्कर लोहबडे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. अध्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर भवनाचे प्रवेश द्वार बंद करण्यात आले. मात्र काही मंडळींनी प्रवेशद्वारावर हुज्जत घालत प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला व यातूनच वाद निर्माण झाले. ग्राम विकास अधिकारी यांनी मध्यस्ती करत प्रवेशद्वार उघडून बाहेर उभे असलेल्या लोकांना आत घेतले. परंतु आत येताच दोन गटात धक्काबुक्कीला सुरुवात झाली. अचानक धक्काबुक्कीचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना जमेल त्या पद्धतीने लाता, बुक्क्या, खुर्च्या भिरकावित हाणामारी ला सुरुवात केली, ज्यामध्ये अनेकांना गंभीर दुखापती झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने पोलीस यंत्रणेला प्राचारित केले. शेवटी दोन्ही गटांनी पोलीस स्टेशन गडचांदूर गाठून एकमेका तक्रार नोंदविली. रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासनाने दोन्ही गटाचे ऐकून घेत हारून सिद्दिकी, मुन्ना सिद्दिकी, आलम खान सोबतच चंद्रप्रकाश बोरकर, निनाद बोरकर, पवन मौर्या, नितेश लोहबळे यांच्यावर 323, 504, 506 भादवि कलमा अंतर्गत अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. सर्वांना नोटीस देत उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर यांच्या आवारपूर कार्यालयात उपस्थित राहण्याची ताकीद देण्यात आली.

        तंटामुक्त समितीचा अध्यक्ष तथा समिती याची निवड ही मुळात गावात स्थानिक पातळीवर होणारे वादविवाद सामोपचाराने निकाली निघावे, सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या दरबारामध्ये जाण्याची वेळ येऊ नये, गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी हा मूळ हेतू असताना अध्यक्षाच्या निवडीवरूनच हाणामारी होणे हे गावाच्या हिताच्या विरोधात आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट असलेल्या लोकांनाच प्रवेश असतो मात्र या ठिकाणी अनेक नवयुवक ज्यांचे मतदार यादीत नाव सुद्धा नाही यांच्या उपस्थितीमुळे भांडणाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले असावे अशीही चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे. शिवाय नुकतीच नांदा ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली ज्यामध्ये ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने विजयाचा कौल दिला व एका गटाला केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सदर प्रकार उध्दभवला असावा व निवडणुकीचे पडसाद अध्यक्ष निवडीमध्ये उमटले असावे अशी सुद्धा चर्चा होताना दिसत आहे. शिवाय हाणामारी मध्ये ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सुद्धा अग्रस्थानी असल्याचे दिसते त्यांचे कडून अशा प्रकारचे विघातक कृत्य होऊ नये अशी अपेक्षा असताना त्यांचा या हाणामारी मध्ये सहभाग असणे हे सुद्धा अशोभनीय आहे, अशी चर्चा आहे. गावाच्या विकासाचा विचार बाजूला सारत ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचे अशोभनीय कृत्य यापुढे होणार नाही याची दक्षता स्थानिक प्रशासनाने यापुढे वेळेपूर्वीच घ्यावी अशी सामान्य नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसते शेवटी स्थानिक प्रशासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यात आली. यामध्ये भास्कर लोहबळे यांचा 22 मतांनी विजय होत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top