Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: राज्यात सत्ता परिवर्तन होताच मूर्ती विमानतळाचा मार्ग सुकर होईल काय
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राज्यात सत्ता परिवर्तन होताच मूर्ती विमानतळाचा मार्ग सुकर होईल काय राजकीय हेव्यादाव्यातून रखडला होता प्रकल्प आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क राज...
राज्यात सत्ता परिवर्तन होताच मूर्ती विमानतळाचा मार्ग सुकर होईल काय
राजकीय हेव्यादाव्यातून रखडला होता प्रकल्प
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
राजकीय हेव्यादाव्यातून एखादा प्रकल्प रखडत असेल तर त्याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना होत असतो, बेरोजगारांना रोजगारापासून मुकावे लागते. अशीच बाब राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मूर्ती विमानतळाच्या बाबतीत घडली. चंद्रपूर जिल्ह्यात विमानतळ काळाची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन तत्कालीन वित्तमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. २०१८ मध्ये राजुरा तालुक्यात मूर्ती येथे ग्रीनफिल्ड विमानतळास मान्यता मिळाली. प्रकल्पासाठी मुनगंटीवार यांनी ४६ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी जमीन संपादनासाठी मूर्ती परिसरात प्रक्रिया सुरू केली. स्थानिक लोकांना विश्वासात घेतले. आपल्या भागाचा विकास होईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी सहकार्य केले आणि भविष्यात रोजगार निर्मिती आणि उद्योगांना चालना देणाऱ्या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे काम वेगाने सुरू झाले. 
या प्रकल्पातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमही जमा झाली. मात्र, २०१९ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि राजुरा तालुक्यातील मूर्ती येथे होणाऱ्या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या प्रकल्पास ब्रेक लागला. मागील तीन वर्षांपासून महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प थंडबस्त्यात आहे. या प्रकल्पात कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्पामुळे या भागाचा कायापालट होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी आस त्यावेळी मिटली होती मात्र आता राज्यात पुन्हा सत्ता बदल झाले असताना कालांतराबे का होईना हा नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 
२१ डिसेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार चंद्रपूर विमानतळाच्या विकासकामांना मान्यता देत जमीन संपादनासाठी सुधारित क्षेत्र आखण्यात आले होते. यात राजुरा तालुक्यातील मूर्ती आणि विहीरगाव शेत शिवारातील खासगी, शासकीय ७२० एकर जमीन संपादितकरून त्यासाठी ४६ कोटींचा निधीही देण्यात आला होता. मूर्ती येथील ग्रीनफिल्ड विमानतळासाठी जमीन संपादनाची प्रक्रियाही जवळपास पूर्ण झाली होती. जिल्ह्यात प्रथमच कार्गो हब तयार होत असल्याने नवीन प्रकल्पांना चालना मिळेल आणि रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा स्थानिकांना होती. मात्र २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे राज्य शासनाने पाठ फिरविली. 
कोट्यवधी रुपये खर्चून जमीन संपादनाची प्रक्रिया झाली. मात्र मागील तीन वर्षात कुठलीच प्रगती झालेली नाही. १ डिसेंबर २०२० रोजी मुख्य सचिव यांना दिलेल्या पत्रानुसार विमानतळाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात संपादित केलेल्या जमिनीचा ताबा विमानतळ कंपनीला मिळालेला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना गती देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वासाठी पुन्हा राजकीय प्रयत्न सुरू होईल का याबाबत स्थानिक नागरिकांत उत्सुकता आता निर्माण झाली आहे. 

भद्रावतीला स्थानांतरित करण्याचाही झाला होता प्रयत्न 
मधल्या काळात राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मूर्ती विमानतळाला भद्रावती येथे हस्तांतरित करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. मात्र त्यांच्या या मागणीला राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजय धोटे यांनी कडाडून विरोध केला होता. 

जोगापूर वन परिक्षेत्र विमानतळ प्रकल्पाकरिता अडथळा निर्माण निर्माण होण्याची शक्यता
मागील तीन वर्षाच्या काळात विमानतळ प्रकल्प थंड बस्त्यात राहिल्याने मध्यंतरी वन वनविभागा तर्फे जवळपास दहा हजार हेक्टर असलेल्या या वन परिसरात जंगल सफारी सुरु करण्यात आली आहे. वन विभागाने या माध्यमाने पर्यटन वाढीला प्रोत्साहन दिले असून पर्यटनाला सुरुवातही झाली. 
वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार मूर्ती येथील विमानतळाचा परिसर वन्यजीवांचा भ्रमण मार्ग म्हणून दाखविला आहे. त्यामुळे आता वनविभागाकडून अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र विमानतळ आणि जोगापूर जंगली सफारी पर्यटन यात योग्य ताळमेळ बसविल्यास स्थानिकांना रोजगार व्यातिरिक्त जिल्ह्याच्या विकासाला ही चालना मिळू शकते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top