Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सास्ती चेकपोस्ट वर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पाच तास कोळसा वाहतूक बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सास्ती चेकपोस्ट वर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पाच तास कोळसा वाहतूक बंद सास्ती, मानोली व धोपताळा शिवारातील शेतकऱ्यांची उर्वरित जमी...
  • सास्ती चेकपोस्ट वर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पाच तास कोळसा वाहतूक बंद
  • सास्ती, मानोली व धोपताळा शिवारातील शेतकऱ्यांची उर्वरित जमीन अधिग्रहणाची मागणी
  • उद्या सीजीएम कार्यालयात बैठक होणार असल्याचे आश्वासन
  • शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याबद्दल अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांनी घेतली आग्रही भूमिका 
  • आंदोलनाला माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिली भेट
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सास्ती, मानोली व धोपताळा गाव परिसरातील शेतकऱ्यांची जमीन वेकोलिने कोळसा खाणी करीता अधिग्रहित केली असून आता या ठिकाणी केवळ सोळा टक्के जमीन शिल्लक राहिली आहे. या भागातही कोळसा असून ती जमीन अधिग्रहित करावी या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी सास्ती कोळसा खाणीच्या चेकपोस्ट वर ठिय्या आंदोलन केले. 
आंदोलनामुळे जवळपास पाच तास कोळसा व इतर साहित्य वाहतूक करणारी वाहतूक पूर्ण पणे बंद झाली. वाहतूक बंद होताच वेकोलि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अखेर आंदोलकांची भेट घेत या विषया संदर्भात उद्या दिनांक 10 जुन ला बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितल्याने अखेर दुपारी 3 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले व वाहतूक सुरु झाली. 
आज सकाळी 10 वाजता पासून शेतकरी आंदोलकांनी चेकपोस्ट वर आंदोलन सुरू केल्याने येथे ट्रकच्या रांगा लागल्या. या भागात धोपटाळा ओपन कास्ट माईन सुरू झाली आहे. त्यासाठी या क्षेत्रातील 84 टक्के जमिनी वेकोलीने अधिग्रहित केल्या आहेत. मात्र याच भागात असलेली उर्वरित 16 टक्के जमीनी अधिग्रहित करण्यात आली नाही. या भागात कोळसा उत्खननाचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना येथे शेती करणे अत्यंत कठीण झाले आहे. या भागात होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे सुरक्षिततेचा प्रश्नही उत्पन्न झाला आहे. बॅक वॉटर मुळे येथील शेती डुबण्याची शक्यता असल्याने तसेच वन्य प्राण्यांचे वास्तव्य शिवाय धूळ व प्रदूषण यामुळे पिकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे आता ही जमीन सुद्धा वेकोलिने अधिग्रहित करावी अशी रास्त मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच दुपारी 2 वाजताच्या दरम्यान वेकोलिचे नियोजन अधिकारी जी. पुलय्या, क्षेत्रीय कार्मिक व्यवस्थापक समीर बारला, क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी राजूरकर, वेकोलि अधिकारी माटे व इतर अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याबद्दल अँड.इंजि. प्रशांत घरोटे यांची आग्रही भूमिका घेतली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिनांक 10 जुन ला वेकोलीच्या सास्ती टाउनशिप येथील बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तोडगा निघेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याआधीही या शेतकऱ्यांचा उर्वरित जमिनी अधिग्रहित करण्याबद्दल भाजपा जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष राजू घरोटे यांनी सुरुवातीपासून पुढाकार घेऊन वेकोलि मुख्य महाप्रबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, वेकोलि मुख्यालय नागपूर या ठिकाणी माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या माध्यमातून वरिष्ठस्तरीय बैठकांमध्ये हा मुद्दा लावून धरला होता, हे विशेष. 
आंदोलनाला शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी भेट दिली. आंदोलनात सास्ती, मानोली व धोपताळा येथील शेतकरी पियूष हिंगाणे, दीपक देरकर, भास्कर चौधरी, मारोती वाढई, मोहन पेरकंडे, शंकर नक्षिणे, नंदू जेनेकर, अविनाश माशिरकर, विनोद जूनघरे, अविनाश झाडे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top