आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
स्थानिक रमानगर वार्डात नरेश गजभिये या ४० वर्षीय युवकांचे हातपाय बांधून खून केल्याची घटना दिनांक 12 एप्रिल ला रात्री उघडकीस आली होती. मृतक नरेश यांच्या आई सुमन गजभिये यांच्या तक्रारीनंतर दोन आरोपीवर भादंवि 304, 34 कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मृतक नरेश यांच्या आई सुमन प्रेमदास गजभिये यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार नरेश हा वेडसर असल्याने वार्डात शिवीगाळ व मारहाण करीत होता. घटनेच्या दिवशी मृतक हा शेजारील आशा आगलावे या महिलेला मारहाण करीत होता. महिलेला मारहाण करीत असतांना मृतकची आई सुध्दा सोडविण्यासाठी गेली. मारहाणीची माहिती महिलेचे पती विठ्ठल शंकर आगलावे यांना कळताच त्यांनी प्रदीप माणुसमारे यांच्या मदतीने नरेशचे हातपाय घरातील पलंगाला बांधले. त्यानंतर मुलगा नरेशचा मृत्यू झाला, असे आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पण निव्वळ हातपाय बांधल्याने नरेशचा मृत्यू झाला नाही असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. नरेशचे हातपाय घट्ट बांधून त्याचा गळा आवळण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या मृत्यू प्रकरणी आरोपी विठ्ठल आगलावे व प्रदीप माणुसमारे यांच्या विरोधात भादंवि 304, 34 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.