- वेकोलिने साखरीच्या शेतकर्यांची फसवणूक केल्याने न्यायाची मागणी
- २३ मार्च पासुन पंढरी घटे यांचे बेमुदत उपोषण सुरू
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील साखरी वाघोबा येथील शेतजमीन वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या पोवनी ओपनकास्ट कोळसा खाण क्रमांक दोन व तीन करिता अधिग्रहित करण्यात आली. मात्र वेकोलिने शेतकर्यांची फसवणूक केली असून सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणुन साखरी येथील सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्ती अध्यक्ष पंढरी पाटील घटे यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. दिनांक 23 मार्च ला सकाळी दहा वाजता पासून वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालयापुढे पंढरी घटे उपोषणाला बसले असून त्यांना प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि जनतेचा चांगला पाठींबा मिळत आहे.
आंदोलनकर्त्या शेतकर्यांना करारपत्रानुसार शेतकर्यांना मोबदला व नोकरी देत नाहीत आणि विचारणा करण्यासाठी गेल्यावर हे अधिकारी माहिती न देता अपमानास्पद वागणूक देऊन वारंवार परत पाठवितात. यामुळे गावातील एका प्रकल्पग्रस्त मुलीने आत्महत्या केली होती. असे गंभीर आरोप ज्या भूगर्भातून कोळशाचे उत्पादन होणार आहे, त्या शेतीच्या मालकाला त्या शेतकर्यांनी खुलेआम केले आहे. सन २०१६ पासून कोल बेअरींग सेक्शन ९ लागु केल्यानंतर कार्यालयाच्या फेर्या मारूनही अनेकांना नोकरी व मोबदला दिला नाही. मग अर्धा लोकांना नोकरी देऊन इतरांना मात्र ताटकळत ठेवले. काही शेतकर्यांचे करारपत्र न करता या काळात जबरीने कोळसा खाण सुरू केली. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर आम्हाला कागदपत्रे गोळा करणे, वैद्यकिय तपासणी यासाठी मोठा वेळ लावून हेतुपुरस्सर विलंब केला. गेल्या पाच-सहा वर्षापासून आमच्या मालकीची जमीन असतांना वेकोलि अधिकारी आमच्याशी तुच्छतेने वागत असून अनेकदा अपमानित करीत आहेत. यामुळे आमच्या गावातील एका प्रकल्पग्रस्त मुलीने विष पिऊन आत्महत्या केली. अद्यापही वेकोलि अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली नसून प्रकल्पग्रस्त शेतकरी पूर्वीप्रमाणेच नोकरी व मोबदल्या विषयी विचारणा करायला गेल्यावर अधिकारी वारंवार बोलावून अपमानित करीत आहेत. या सर्व समस्या विषयी निवेदन देऊनही काहीही सूचना मिळाली नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई होण्यासाठी आणि शेतकर्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, यासाठी उपोषण करीत असल्याचे पंढरी घटे यांनी सांगितले. यासंदर्भात केंद्रीय कोळसा मंत्री, सीएमडी नागपूर, चंद्रपूर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी उपोषण मंडपात शेषराव बोंडे, बळीराम खुजे, मारोती गोसावी उरकुडे, मारोती श्रावण उरकुडे, सुंदरलाल कावळे, वासुदेव पिंपळकर,धनराज लांडे, विजय निमकर, आतिश पिदूरकर, प्रमोद पिंपळकर उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या या आहेत मागण्या
- प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या वतीने सात - आठ वर्षापूर्वी करारनामा करूनही अद्याप नोकरी व मोबदला न दिल्याने या आर्थिक नुकसानीपोटी प्रत्येक शेतकर्याला सात लाख रुपये देण्यात यावे.
- प्रती सातबारा एक नोकरी ताबडतोब द्यावी.
- शेतजमीन ज्या कोळसा खाणी करिता अधिग्रहित केली असेल त्याच प्रकल्पात नोकरी द्यावी अथवा प्रकल्पग्रस्ताच्या मागणी नुसार नोकरीचे ठिकाण द्यावे.
- साखरी गावातील शेतीव्यवसाय बंद झाल्याने गावातील बेरोजगारांना काम द्यावे.
- गावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून पाणी मारून व अन्य उपाय करून ते कमी करावे आणि साखरी गावात रस्ते, नाल्या करून विकास करावा तसेच गाव विकासाचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे.
- वारंवार शेतकर्यांना अपमानित करणे थांबवावे आणि प्रकल्पग्रस्त कामगारांना शिक्षणानुसार काम देऊन अधिकाऱ्यांनी दबाव आणू नये.
- यापुर्वी प्रकल्पग्रस्त मुलीने वेकोलि अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती, त्या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करावे.
- सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कसलाही भेदभाव न करता सारखा न्याय द्यावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.