- इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसचे ट्रबलशूटर मानले जात होते अहमद पटेल
- अहमद पटेल होते सोनिया गांधींचे सर्वात जवळचे सल्लागार
- राजीव गांधींच्या काळात अहमद पटेलांचा प्रभाव वाढला
दिल्ली -
काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे वयाच्या 71 वर्षी बुधवारी निधन झाले. पटेल काँग्रेसचे संकटमोचक मानले जात होते. ते सोनिया गांधींचे सर्वात जवळच्या सल्लागारांमध्ये सामिल होते. पटेल यांची गणना काँग्रेसच्या सर्वात ताकदवान नेत्यांमध्ये होत होती. परंतु ते कधीच सरकारचा भाग नव्हते. इंदिरा गांधींच्या काळापासून पटेल यांचे गांधी घराण्याशी जवळचे संबंध होते. 1977 मध्ये ते अवघ्या 28 वर्षांचे होते तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना भरुचमधून उमेदवारी दिली होती.
राजीव गांधींच्या काळात अहमद पटेलांचा प्रभाव वाढला
1980 आणि 1984 च्या काळात अहमद पटेल यांचा काँग्रेसमधील प्रभाव वाढला. या काळात इंदिरा गांधींनंतर जबाबदारी सांभाळण्यासाठी राजीव गांधींना तयार केले जात होते. त्यानंतर अहमद पटेल राजीव गांधींच्या जवळ आले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी 1984 मध्ये लोकसभेच्या 400 जागांवर बहुमत घेऊन सत्तेत आले आणि पटेल हे कॉंग्रेसचे खासदार होते व त्यांना पक्षाचे सहसचिव बनवण्यात आले. त्यांना काही काळासाठी संसदीय सचिव आणि नंतर काँग्रेसचे महासचिवही बनवण्यात आले.
नरसिंह रावांच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला
1991 मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर अहमद पटेल हे बाजूला सारले गेले. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्यत्वाव्यतिरिक्त अहमद पटेल यांना सर्व पदांवरून काढून टाकले. त्यावेळी गांधी परिवाराचा प्रभावही कमी झाला होता, त्यामुळे गांधी कुटुंबाच्या निष्ठावंतांनाही अडचणींचा सामना करावा लागला. नरसिंह राव यांनी मंत्रिपदाची ऑफर दिली तेव्हा पटेल यांनी फेटाळून लावली. ते गुजरातमधून लोकसभा निवडणूकही हरले आणि त्यांना सरकारी घर रिकामे करण्यासाठी नोटीस मिळू लागली, पण त्यांनी कोणाकडून मदत घेतली नाही.
अतिशय स्ट्रॅटेजिक पध्दतीने काम करायचे
2004 मध्ये UPA स्थापना झाली तेव्हा अहमद यांनी मंत्रिमंडळात येण्यास नकार दिला आणि पक्षासाठी काम करत राहण्याची इच्छा व्यक्त केली. 2004 ते 2014 या काळात UPA दोन्ही कार्यकाळात त्यांनी पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वयाचे अधिक चांगले काम केले. मीडिया रिपोर्ट नुसार रात्री उशिरापर्यंत काम करणे आणि कोणत्याही वेळी कोणत्याही कॉंग्रेस कार्यकर्त्याला कोणतेही काम सोपवणे हे पटेल यांच्या सवयीमध्ये समाविष्ट होते. असे म्हणतात की ते एक मोबाईल फोन नेहमीच फ्री ठेवत असत. ज्यावर फक्त 10 जनपथवरून फोन येत असत. ते अतिशय स्ट्रॅटेजिक पध्दतीने काम करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी वक्तव्यापेक्षा रणनीती घेऊन काम करावे असे ते म्हणायचे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.