''लाडकी बहिण योजनेसाठी आदिवासींचा निधी वळती''
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०९ मे २०२५) -
राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेसाठी अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी असलेला ७४६ कोटी रुपयांचा निधी वळती केल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. नार गोटूल प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापुराव मडावी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत निवेदन पाठवून या निधीची परतफेड करण्याची मागणी केली आहे.
सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात आदिवासी विकासासाठी २१४९५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, लाडकी बहिण योजनेसाठी ४ हजार कोटींची कपात करून, एप्रिल २०२५ चा हप्ता देण्यासाठी ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळती करण्यात आला. यामुळे आदिवासींच्या विकास योजना प्रभावीत होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासीबहुल, दुर्गम आणि मागास भागातील पायाभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत. रस्ते, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, सिंचन, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, आश्रम शाळा व वसतिगृहे या सुविधा पुरेशा नाहीत. या पार्श्वभूमीवर आदिवासींचा हक्काचा निधी वळती करणे अन्यायकारक असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळती केल्यामुळे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बापुराव मडावी यांच्यासह मनोज कुरवटकर (ग्रामपंचायत सदस्य), जयपाल राऊत (सरपंच सोंडो) व इतर मान्यवरांनी हे निवेदन सादर केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.