Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतकऱ्याने ६ एकर शेतीत घेतले १०० क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोवनी येथील शेतकऱ्याची यशोगाथा शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे अनिल गंपावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलत...

  • पोवनी येथील शेतकऱ्याची यशोगाथा
  • शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे

अनिल गंपावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही एवढी शेतीची अवस्था बिकट होत असतांनाच राजुरा तालुक्यातील पोवनी येथील युवा प्रगतिशील शेतकरी प्रफुल्ल बाबाराव कावळे (३२) यांनी आपल्या शेतातील ६ एकर शेतात कारल्याची लागवड केली होती. मिरचीच्या आधुनिक पद्धतीने लागवड केलेल्या शेतीतून त्यांना चांगलेच विक्रमी उत्पादन मिळत आहे. आजपर्यंत त्यांनी १०० क्विंटल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले असून त्यांना १५० क्विंटल मिरचीचे उत्पादन होणे अपेक्षित आहे.

निसर्गाची अवकृपा, नापिकी, कर्जबाजारी यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतीवर केलेला खर्चही भरून निघत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची होरपळ सुरूच आहे. मात्र राजुरा तालुक्यातील पोवनी येथील युवा प्रगतिशील शेतकरी प्रफुल्ल कावळे यांनी आपल्या ६ एकर शेतात तीन प्रकारच्या मिरचीची आधुनिक लागवड केली आहे. शेतकरी प्रफुल्ल बाबाराव कावळे  यांची पोवनी गावालगत शेती आहे. या शेतात त्यांनी ६ एकर शेतात यंदा मिरचीचे पीक घेतले आहे. प्रारंभी मिरचीवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मिरचीवर अतोनात खर्च केल्यानंतर कसेबसे पीक हाती येण्याची आशा पल्लवीत झाली. प्रफुल्ल कावळे यांचे शेताचे सभोवताल वेकोलीच्या कोळसा खाणींनी मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यावर काटेरी झुडपे वाढल्याने वन्यप्राणी भरदिवसा शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. परंतु हे सारे वन्यप्राण्यांचे उद्व्याप सहन करीत प्रफुल्ल कावळे यांनी मोठ्या उमेदीने मिरचीची शेती केली आहे.त्यांनी आजपर्यंत १०० क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले असून पुन्हा ५० क्विंटल मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे. यंदा मिरची पिकाला नागपूर बाजारपेठेत १५ हजार रुपयांपर्यंत चांगला दर असल्याने शेतकऱ्यांना  बऱ्यापैकी नफा मिळण्याची शक्यता आहे. निसर्गाचा लहरीपणा, नापीकी यामुळे शेतीवर अवकळा आल्याने शेतकरी कर्जबाजारी होतात.परंतु  ६ एकर शेतात मिरचीचे विक्रमी उत्पादन घेऊन प्रफुल्ल कावळे या युवा शेतकऱ्याने शेती करणे सोडू पाहणाऱ्या हताश झालेल्या असंख्य शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण दाखविला आहे. प्रफुल्ल कावळे यांनी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेऊन नवा आदर्श ठेवला आहे. यासाठी राजुरा तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले व कृषी सहाय्यकांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. एकीकडे शेतीला अवकळा आली असताना पोवनी येथील शेतकऱ्याने मोठ्या हिंमतीने प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर पिकविलेला मिरचीची शेती नक्कीच हताश झालेल्या शेतकऱ्यांना आशेचा नवा शोध घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करायला लावणारा आहे.

निसर्गाची अवकृपा, शासनाचे शेतकरी विरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली तर नक्कीच शेतीत भरघोस उत्पादन येईल.आजपर्यंत १०० क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले असून पुन्हा ५० क्विंटल पर्यंतअसे एकूण १५० क्विंटल पर्यंत मिरचीचे  विक्रमी उत्पादन होणे अपेक्षित आहे.यासाठी शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळावे.
प्रफुल्ल कावळे
प्रगतिशील युवा शेतकरी, पोवनी


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top