संततधार पावसाने रस्त्यावरच पूर, नागरिक घरात कैद
घरे-रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत
तुकूम-शास्त्रीनगर जलमय, बामणवाडा ओव्हरब्रिजचा फज्जा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे / कृष्णा गेडाम
चंद्रपूर / राजुरा (दि. २४ जुलै २०२५) -
सलग आणि मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरात रस्ते जलमय झाले असून, वाडे, खालील भाग, बाजारपेठा, बँका, रुग्णालये, शाळा, दुकाने यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. महानगरपालिकेच्या अपयशी यंत्रणेमुळे बँक वॉटरमुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
शहर ठप्प – दुकाने, बँका पाण्यात
गांधी चौक, जटपुरा गेट, आजाद बाग, जयंत टॉकीज, लक्ष्मीनारायण मंदिर, लोकमान्य टिळक विद्यालय परिसरात गुडघ्यांपासून कमरेपर्यंत पाणी साचले होते. मोहित मोबाईल, शंकराश्रम लॉज, वनविभाग कार्यालय आणि बागेजवळील दुकानांमध्ये पाणी घुसले. एसबीआय बँक पाण्यात बुडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ड्रेनेजचा फज्जा, नाले उघडे – जीवितहानी टळली
शाळेतून घरी निघालेले विद्यार्थी, महिला, नागरिक उघड्या नाल्यांमध्ये पडण्याच्या उंबरठ्यावर होते. ड्रेनेजवर डेक्कन न बसवल्याने हे प्रकार झाले. नशिबाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मनपा अपयशी – जनतेचा संताप
महापालिकेच्या नाला सफाई मोहीमेची पोल उघड झाली आहे. नाले चोक, अतिक्रमण आणि निकृष्ट नियोजनामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. कस्तुरबा रोड, महात्मा गांधी रोड, मच्छीनाला, बस स्टँड ते बंगाली कॅम्प, आरटीओ रोड जलनगर परिसर जलमय झाले.
राजुराचा गडचांदूरशी संपर्क तुटला
रात्री ९.३० च्या सुमारास राजुरा नाका क्रमांक ३ जवळील भवानी माता मंदिराजवळील पुलावरून नाल्याचे पाणी वाहत असल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली. राजुरा-गडचांदूरचा संपर्क तुटला होता.
विरुर पोलिसांची धाडसी कामगिरी
वरुर-विरुर मार्गावर नाले तुडुंब वाहत होते. ठाणेदार संतोष वाकडे, पोलीस कर्मचारी राहुल वैद्य, विजय मुंडे, हर्षल लांडे यांनी पोलिसांची जीप पाण्यात उतरवून 60 अडकलेल्या विद्यार्थ्यांना पाणी-बिस्किटे दिली, आणि दोन बसेस सुरक्षित बाहेर काढल्या. रात्री १२ पर्यंत सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचले. नागरिकांनी या धाडसाचे जोरदार कौतुक केले.
बामणवाडा ओव्हरब्रिजमुळे पूरस्थिती
राजुरा-चुनाळा मार्गावरील बामणवाडा परिसरात नवनिर्मित ओव्हरब्रिजमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. अनेक घरात पाणी घुसले असून, या भागात प्लॉट खरेदीदारांची धाकधूक वाढली आहे.
नाईकनगर पुन्हा पाण्याखाली
नाईकनगर गावात नाल्याचा पूर आल्याने घरे, अन्न, कपडे, संसारोपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्या. गावापासून ५० मीटरवर बांधलेला बंधारा ही मुख्य कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावकऱ्यांनी बंधारा तात्काळ पाडावा, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करावा, नुकसानभरपाई नव्हे, कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, पूरग्रस्तांना पक्क्या घरकुलांची तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी बंजारा टायगर युवा संघटना चे प्रमुख प्रमोद राठोड, शिवकुमार आडे, श्रीकांत आडे, लखन चव्हाण, अभिषेक राठोड, आकाश आदे, कृष्णा जाधव, अनीश राठोड, भूषण राठोड, आशुतोष जाधव, पंकज राठोड, संदीप पवार, प्रफुल्ल जाधव, कुणाल शेंडे, उमेश चव्हाण, आदित्य चौधरी आदींनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.