पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लघु आणि मध्यम शेतकऱ्यांना तसेच दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारच्या वतीने दिली जाते. दोन हजार रुपये प्रती हप्त्याने हा निधी वितरित करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या काळातील या निधीची आकडेवारी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील २ लाख १० हजार ८३ पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधीचे वाटप करण्यात आले आहे.
मात्र, या निधीचे वाटप करताना अपात्र शेतकऱ्यांनाही रक्कम देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार, ४ कोटी ८७ लाख ८४ हजार रुपये अपात्र शेतकऱ्यांना 'चुकून' वाटण्यात आले आहेत. चुकीने असा निधी मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या ६ हजार २६८ इतकी आहे. याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील प्राप्तीकर भरणारे आणि योजनेत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ७१२ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या अपात्र शेतकऱ्यांना वाटलेली रक्कम परत घेण्यासाठी तालुकास्तरावर वसुली करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.