धान्य वितरणातील गोंधळामुळे लाभार्थ्यांचे हाल
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (राजुरा) (दि. ०७ ऑगस्ट २०२५) -
सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून दर महा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याच्या वाटपात यंदा शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हजारो गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांचे रेशन एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत अडचणी आणि तांत्रिक त्रुटींमुळे अनेक लाभार्थ्यांना या काळात धान्य मिळालेले नाही.
प्राथमिक टप्प्यात जरी मशीनवर तीनही महिन्यांचे धान्य दाखवले जात होते, तरी सध्या केवळ ऑगस्ट महिन्याचेच रेशन दिसत आहे. जून व जुलै महिन्यांचे रेशन ‘गायब’ झाल्याचे चित्र अनेक दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसामुळे, आजारपणामुळे किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे वेळेत रेशन घेऊ न शकलेले कार्डधारक आता रेशनहून वंचित झाले आहेत.
याशिवाय, काही ठिकाणी गोदामांमध्ये पुरेसा साठा नसल्यामुळे रेशन दुकानांपर्यंत माल पोहोचलेलाच नाही. सततचा सर्व्हर डाऊनचा त्रासही रेशन वाटपात अडथळा ठरत आहे. परिणामी, कार्डधारक आणि रेशन दुकानदार यांच्यात वादाची स्थिती निर्माण झाली आहे. “आमचं मागचं रेशन गेलं कुठे?” असा प्रश्न विचारत अनेक कार्डधारक दुकानदारांकडे तगादा लावत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे सर्वसामान्य गरजू नागरिकांना फटका बसत असून, शासनाने तातडीने यात लक्ष घालून मागील महिन्यांचे धान्य उर्वरित पात्र लाभार्थ्यांना वितरित करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
#RationSystemFailure #FoodRightsForAll #PublicDistributionChaos #WhereIsOurRation #CitizensDeserveBetter #JuneJulyRationMissing #ServerDownCrisis #PoorSufferInSilence #FixPDSNow #VidarbhaVoices #aamchavidarbha #vidarbha #chandrapurupdate #chandrapurian #chandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.