- कामगारांवर उपासमारीचे संकट ; व्यवस्थापन लक्ष देईना
राजुरा -
राजुरा तालुक्यातील पांढरपौनी आर्यन कोल वॉशरीज कंपनी २०१८ मध्ये काही कारणामुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कामगारांना कामावरून काढण्यात आले होते. जेव्हा कंपनी पुन्हा सुरू होईल तेव्हा परत जुन्याच कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन कामगारांना दिले होते. परंतु कंपनी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी कामगारांना कामावर घेण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कामगारांत कंपनी विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. आर्यन कोल वॉशरीज सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. काही जुन्या कामगारांना कंपनीने कामावर घेतल्यानंतर पुन्हा ७ कामगारांना कामावर घेण्यास आर्यन कोल वॉशरीज व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. काम उपलब्ध झाल्यानंतर जुन्याच कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरही कंपनी कामगारांना कामावर घ्यायला तयार नाही. १८ वर्ष कंपनीत काम केल्यानंतरही कंपनीने कामगारांना कामावर रुजू करून घेण्यास नकार दिल्याने कामगारांवर अन्याय होत आहे. परंतु आर्यन कोल वॉशरीज व्यवस्थापन कामगारांचे काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे कामगारांसमोर बेरोजगारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे पांढरपौनी आर्यन कोल वॉशरिज व्यवस्थापनाने जुन्या कामगारांना कामावर द्यावे अशी मागणी वासुदेव लोणारे, अनिल भगत, खुशब पिदुरकर, भगवान व्याहाडकर, विनोद मडचापे, प्रेमचंद उमरे व इतर कामगारांनी केली आहे. कंपनीने कामावर न घेतल्यास कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे. याबाबत आर्यन कोल वॉशरीजचे मॅनेजर भगवंत गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. कामगारांना कामावर न घेतल्यास व कामगारांचे काही बरेवाईट झाल्यास आर्यन कोल वॉशरीज व्यवस्थापन जबाबदार राहील असेही कामगारांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.